नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; एजाज शेख यांचा आरोप

गडचिरोली,प्रतिनिधी :-
नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना गेल्या दहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांनी केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याऐवजी नगराध्यक्षा आणि पाणीपुरवठा सभापती गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
एजाज शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा मिळालेला नाही. नगर परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार ३ जून रोजी गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात येणार असून ५ जूनपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्याची घाई का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नदीतील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असताना नगर परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी वेळेत नियोजन करून आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर शहरवासीयांवर ही परिस्थिती ओढवली नसती, असेही त्यांनी नमूद केले. कामापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिल्यामुळे नागरिकांना भीषण उष्णतेत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरवासीयांच्या मूलभूत हक्कांशी खेळ थांबवून प्रशासनाने प्रथम पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि त्यानंतरच श्रेयवाद व प्रसिद्धीचा विचार करावा, अशी मागणी एजाज शेख यांनी केली आहे.



