आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी

चामोर्शी माता-बाळ मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे २७ वर्षीय महिला व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी आणि आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता जिजा हंसराज सातर (वय २७), रा. चामोर्शी, यांना प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने व योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर महिलेला गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर अमिता मडावी व राज बन्सोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. उपचारात हलगर्जीपणा झाला आहे का, रुग्णाला वेळेत आवश्यक उपचार मिळाले का, रेफर करण्यात विलंब झाला का आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

सहा सदस्यीय समिती गठित

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांनी दि. २४ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अमरेश त्रिवारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद बन्सोड, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. इंद्रजीत नागदेवते, शारीरिक तज्ज्ञ डॉ. मुकुंद ढाले, भूलतज्ज्ञ डॉ. समीर बन्सोड आणि सहायक प्राध्यापक न्यायवैद्यक डॉ. शुभम मुंडे यांचा समावेश आहे.

समितीने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून चौकशी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीचे ठिकाण एचटीटी हॉल, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली असून, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता चौकशी करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

दोषींवर कारवाईची मागणी कायम

चौकशी समिती स्थापन झाल्याने प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतली असली तरी, चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होऊन दोष निश्चित झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अमिता मडावी आणि राज बन्सोड यांनी केली आहे.

माता आणि नवजात बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, उपचारात कोणतीही वैद्यकीय किंवा प्रशासकीय त्रुटी झाली का, तसेच रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळाले का, याचा तपास समितीच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या निष्कर्षाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker