आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी

गडचिरोलीत प्रसूतीनंतर पुन्हा मातामृत्यू; नवजात बाळाचाही मृत्यू

गडचिरोलीत आठ दिवसांत दुसरी घटना

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्याने २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाजुका दिवाकर राऊत (२८, रा. कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांच्या नवजात बाळाचाही प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात आठ दिवसांत झालेला हा दुसरा मातामृत्यू असल्याने आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नाजुका राऊत यांना प्रसूतीसाठी बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून २८ ऑगस्ट रोजी रात्री १.२३ वाजता गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सहा वाजता त्यांची सामान्य प्रसूती झाली. त्यांनी अडीच किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला.

यानंतर सकाळी सुमारे आठ वाजता नाजुका यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. परिस्थिती लक्षात घेऊन ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके आणि डॉ. प्रशांत आखाडे यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होऊन महिलेची तपासणी केली. रक्तस्राव नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रियेसह आवश्यक उपचार करण्यात आले.

उपचारानंतर रक्तस्राव थांबला आणि नाजुका यांना रक्त देण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक त्यांना झटके येण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच रात्री साडेएकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

रक्त मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप

महिलेची प्रकृती गंभीर असताना रक्त उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारातील कथित दिरंगाई आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच माता व बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

आठ दिवसांत दुसरा मातामृत्यू

याच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी चामोर्शी येथील जिजा सातर (२६) या गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.

सलग दोन मातामृत्यूच्या घटनांमुळे जिल्ह्यातील प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, रक्ताची उपलब्धता आणि आपत्कालीन उपचार व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोष अथवा त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker