लांझेडा वार्डातील माता मंदिर ते महादेव मंदिर मार्गावरील अरुंद रस्ता आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतत असून प्रशासनासाठी हा गंभीर इशारा ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक वाहन व रुग्णवाहिका या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने नागरिकांचे प्राण अक्षरशः प्रशासनाच्या दयेवर अवलंबून आहेत.
दि. १३ जानेवारी रोजी वखरे कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीत अग्निशामक वाहन रस्त्याच्या अरुंदपणामुळे घटनास्थळी पोहोचू शकले नाही. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग विझवली म्हणून मोठी दुर्घटना टळली. मात्र संपूर्ण घर जळून खाक झाले.
ही घटना प्रशासनासाठी शेवटचा इशारा मानली जात असून, पुढील वेळी आग, आजारी रुग्ण किंवा प्रसूती रुग्ण अडकला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वारंवार निवेदन, तक्रारी करूनही रस्त्याच्या रुंदीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. वेळेत निर्णय न घेतल्यास लांझेडा वार्डात मोठी दुर्घटना घडणे अटळ असून, त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.