आपला जिल्हा
एकता पार्क चे लोकार्पण…जय भारत पदयात्रा. जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!
जय छत्रपती शिवाजी - जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न

गडचिरोली,प्रतिनिधी:-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित “जय छत्रपती शिवाजी – जय भारत” पदयात्रेने संपूर्ण गडचिरोली शहर शिवमय झाले. “जय शिवाजी, जय भवानी”च्या घोषणांनी शहर दुमदुमले, तर हजारो नागरिकांच्या उपस्थितीने ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने “जय छत्रपती शिवाजी – जय भारत” पदयात्रेचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकता पार्क‘ चे लोकार्पण
पदयात्रेची सांगता शासकीय विश्रामगृह समोरील एकता पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झाली. येथे शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना अभिवादन करून नगरपरिषदेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या ‘एकता पार्क’ चे लोकार्पण आमदार डॉ. मिलिंद नरोटे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




