आपला जिल्हाताज्या घडामोडी
खासगी शेतजमिनीतील वाळू उत्खनन प्रकरणांची ACB चौकशीची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली तालुक्यातील मौजा साखरा तसेच जिल्ह्यातील खासगी शेतजमिनींमध्ये पुरामुळे वाळू जमा झाल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात उत्खनन परवानग्या मिळवून कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.
महसूल व वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पुरामुळे शेतजमिनीवर जमा झालेल्या वाळूचे निष्कासन करण्याच्या धोरणाचा गैरफायदा घेत काही जण नदीकाठावरील खसरे जोडून हजारो ब्रास वाळू उपसत आहेत. स्थानिक तक्रारी असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मौजा साखरा येथे मागील ५-७ वर्षांपासून एकाच कुटुंबाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन परवानगी मिळत असल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच २५ ते ५० लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याचा स्त्रोत काय, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.


