गडचिरोली,प्रतिनिधी :-
एकता नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणा-या ज्या नागरिकांच्या १९० झोपड्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर लावून उध्वस्त केल्या त्या सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक -३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना देण्यात आल्याची माहिती आज २३ जुन रोजी नगर परिषद सभागृहात नगर परिषद व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी भांडारवार यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला नगर परिषदेचे पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख भालेराव, झोपडपट्टी आंदोलनाचे प्रमुख तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी.के.बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला आघाडीच्या प्रवक्त्या मालाताई भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, मिडीया प्रमुख जावेद शेख, विपीन सूर्यवंशी, शकुंतला दुधे,शशिकला शेरकी, वंदना येडमे, सुजाता दुधे, शिल्पा वासनिक, कवडू दुधे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उप मुख्याधिकारी भांडारवार म्हणाले की, दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजने अंतर्गत घरकुल बांधून देण्याचे लेखी पत्र झोपडपट्टी आंदोलकांना देण्यात आले आहे तसेच अतिक्रमण हटवितांना झालेल्या नुकसानीच्या संदर्भाने चौकशी करून अहवाल तयार करून निर्णय घेतल्या जाईल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात वंचितचे सगळे पदाधिकारी झोपडपट्टी वासियांच्या बाजूने खंबीर उभे राहिले त्यामूळे नगर परिषद प्रशासनाने झोपडपट्टीधारकांच्या मागण्या लेखी पत्र देऊन मान्य केल्या आहेत हे आपल्या आंदोलनाचे यश आहे, त्यामूळे तूर्तास ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचेही टेंभुर्णे म्हणाले.
Back to top button