गडचिरोली, प्रतिनिधी :-
‘विकसित गडचिरोली, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आयोजित केलेली ‘व्हिजन २०४७ – गडचिरोली जिल्हा’ बैठक ही जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक आणि स्वागतार्ह पाऊल असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, आरोग्य, पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे. जिल्ह्याची वन, जल, खनिज संपत्ती तसेच जैवविविधता व आदिवासी संस्कृतीचा स्थानिक विकासासाठी प्रभावी उपयोग करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट व रोजगाराच्या समस्या दूर करण्याबरोबरच युवकांचे कौशल्यविकास, कृषी व वनाधारित उद्योग, बांबू प्रक्रिया, पर्यटन आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
‘व्हिजन २०४७’ हे कोणत्याही पक्षाचे व्यासपीठ न राहता गडचिरोलीच्या भविष्यासाठी सर्वपक्षीय व सर्वसमावेशक व्यासपीठ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सामाजिक संस्था, तज्ज्ञ, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, युवक आणि विकासाची सकारात्मक दृष्टी असलेल्या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
बलस्थाने, कमकुवत बाजू, स्पष्ट उद्दिष्टे आणि उपलब्ध क्षमतांचा योग्य वापर करून गडचिरोलीला २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असा सूर पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेत प्रमोद पिपरे, ऍड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button