आपला जिल्हाराजकीय

गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक समीकरणात मोठा फेरबदल सुरू 

‘घरवापसी’ आणि आत्रामांची गुप्त बैठक

उदय धकाते 

गडचिरोली :-

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अहेरी तालुक्याचे राजकारण वेगाने पलटी घेत आहे. आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पुनःप्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने अहेरीत आलापल्ली येथे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन घेतलेल्या बंदद्वार चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.आणि संपूर्ण जिल्ह्यात नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत.

ओल्लालवारांची ‘घरवापसी’ का महत्त्वाची? – खास विश्लेषण

1. परत एकत्र येणारे जुने समीकरण

ओल्लालवार हे मूळचे राष्ट्रवादीचे असल्याने त्यांची पुनरागमन ही केवळ पक्षांतर घटना नाही; तर जुन्या संघटनेचे महत्वाचे नेतृत्व पुन्हा एकत्र येणे असेही त्याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

2. भाजपच्या अहेरीतील नेतृत्वाचे कमकुवत होणे

अहेरीत भाजपचे प्रमुख स्थानिक चेहरे मर्यादित आहेत. ओल्लालवार हे तिथले सर्वात महत्त्वाचे ओबीसी नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे भाजपच्या पायाभरणीत स्पष्ट अंतर पडणार, हे पक्षाच्या अंतर्गत चर्चेत मान्य केले जात आहे.

3. स्थानिक पातळीवर दीर्घ नाराजीचा उद्रेक

गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत गटबाजी, तिकिटांचे गणित, आणि नवे बाहेरून आलेल्यांना प्राधान्य देणे या मुद्द्यांवरून ते नाराज होते. ही नाराजी वाढत गेली आणि आता त्याचे रूपांतर थेट ‘घरवापसी’मध्ये झाले.

4. राष्ट्रवादी (अजित पवार गट) साठी मोठी जोड

अहेरी भागात राष्ट्रवादीचे आधारक्षेत्र मर्यादित आहे. अशा परिस्थितीत ओल्लालवारांसारखा जुना आणि प्रभावी चेहरा पक्षात प्रवेश करणे म्हणजे थेट संघटन शक्ती आणि स्थानिक जनाधार वाढ.

धर्मरावबाबा आत्राम – दीपक आत्राम बैठक : निवडणुकीपूर्वी मोठे चित्र बदलणार ?

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आलापल्ली येथे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन घेतलेल्या बंदद्वार चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या भेटीचे संभाव्य अर्थ….

1. गडचिरोली-अहेरी राजकारणात मोठी आघाडी?

दोन्ही आजी -माजी आत्राम कुटुंबांचे राजकीय वजन मोठे आहे. माजी आमदार दीपक आत्राम हे सद्या राजकीय पटलावर बॅक फूट वर आहेत.निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा संवाद वाढणे म्हणजे भविष्यात नव्या आघाडीची शक्यता.

2. ओल्लालवारांच्या प्रवेशानंतर भाजपवर वाढलेला दबाव,ओल्लालवारांनी भाजप सोडताच, सामोरे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे समीकरण कमकुवत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्रामांची बैठक ही प्रदेशातील मोठ्या राजकीय पुनर्रचनेचे सूचक असू शकते.

3. आलापल्ली–अहेरी या पट्ट्यात समीकरणांचा नवा खेळ

या भागात आदिवासी आणि बहुजातीय, बहुपक्षीय राजकारण आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची बैठक ही केवळ औपचारिक भेट नसून सामाजिक आणि जातीय समीकरणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असा त्याचा अर्थ राजकीय जाणकार लावत आहेत.

4. भाजप आता कोणती रणनीती आखणार?

भाजपकडे याला उत्तर देण्यासाठी नवे चेहरे, स्थानिक नेत्यांना पुनर्बहुमान, किंवा गटांमध्ये समन्वय अशी पावले उचलण्याची गरज भासू शकते.

आगामी काळात कोणता राजकीय चित्रपट दिसू शकतो?

जिल्ह्यासह अहेरी तालुक्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पक्ष फुटू नये म्हणून काट्याची टक्कर आणखी तीव्र होणार.

ओल्लालवारांचा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी (अजित पवार गट) साठी स्थानिक पातळीवरचा टर्निंग पॉइंट.

आमदार धर्मरावबाबा आत्राम भविष्यात लोकसभा क्षेत्रात मोठा राजकीय मोर्चा तयार करतील अशी चर्चा वेगाने पसरत आहे.

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता वाढली असून काही निर्णय तातडीने घेण्याची वेळ येऊ शकते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker