शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर केला आर्थिक फसवणुकीचा आरोप

गडचिरोली, प्रतिनिधी:-
जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे पक्ष प्रवर्ते यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठाचे ऍड. मीनार खोब्रागडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
माझ्याच पक्षातील पदाधिकाऱ्याने माझी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा ,तसेच त्यांच्या आर्थिक स्त्रोताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याच शिवसेना (उबाठा) पक्षाचे अॅड. मिनार खोब्रागडे यांनी गामा च्या पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परीषदेत माहिती देताना अॅड. मिनार खोब्रागडे म्हणाले की, दिनांक १९ आॅक्टोबर २०२४ रोजी शिवसेना (उबाठा) युवासेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांनी मला फोनद्वारे कळविले की, मी तुला एक सेकंडहंड स्कोर्पिओ गाडी खरेदी करून देतो ,परंतु त्यासाठी पूर्व बुकिंग करावी लागेल. त्याकरिता बुकिंग रक्कम म्हणून २५००० रुपये द्यावे लागतील व उर्वरित रक्कम गाडीची डिलिव्हरी झाल्यानंतर द्यावी लागेल, असे सांगितले आणि हे पैसे पत्नी योगीता पवन गेडाम यांच्या फोन पे नंबरवर टाकण्यास सांगितले. त्यानंतर मी पवन राघो गेडाम यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांची पत्नी योगीता पवन गेडाम यांच्या फोन पे नंबर ८४८४९०९५४८ या नंबरवर २५००० रुपये १९ आॅक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:४५ मिनटांनी पाठविले.
पवन राघो गेडाम यांनी डिसेंबर महिन्यात तुम्हाला गाडी देऊ असे सांगितले. जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये मी अद्याप गाडी न मिळाल्याने पवन राघो गेडाम यास फोन करून विचारले असता काही कारणाने गाडी बुक होऊ शकली नाही . त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्यात गाडी पाठववितो असे सांगितले. मी जानेवारी महिन्य्यात फोन केला असता पवन राघो गेडाम यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पवन राघो गेडाम यांनी फोन उचलणे बंद केले. काही दिवसानंतर मी पवन राघो गेडाम यांना गाडी किंवा पैसे वापसीबद्दल विचारणा केली असता “तुम्हाला तुमचे पैसे तसेच गाडी देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या” अशी धमकी दिली. पवन राघो गेडाम यांचा सेकंड हॅंड गाडी विक्रीचा कुठलाही नोंदणीकृत व्यवसाय नाही. त्याने मला गाडी विक्रीचा व्यवसाय करतो असे खोटेनाटे सांगून माझ्याकडून गाडी खरेदी करण्याकरिता बुकिंग रक्कम २५००० रुपये घेतले असून माझी आर्थिक फसवणूक केली आहे.
त्या अनुषंगाने ६ मार्च २०२५ रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली इथे लेखी फिर्याद दिली. मी १९ आॅक्टोबर २०२४ रोजी घडलेल्या घटनेबाबत तक्रार प्रत्यक्ष पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जाऊन दिली होती.परंतु पोलिस स्टेशनमधून सांगण्यात आले की हे दिवाणी प्रकारचे प्रकरण आहे. त्यामुळे तुम्ही न्यायालयात दाद मागावी, अशी माहिती अॅड. खोब्रागडे यांनी दिली.



