गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. २५ ऑक्टोबर २०२५ पासून सर्व ३८ दरवाजे क्रमशः बंद करण्यात येणार आहेत.दरवाजे बंद केल्यानंतर नदी पात्रात व उपनद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चिचडोह बॅरेज चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी मुख्यालयापासून उत्तरेस सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. या धरणाचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले. धरणाची लांबी ६९१ मीटर असून त्यात ९ मीटर उंचीचे आणि १५ मीटर लांबीचे ३८ लोखंडी उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी धरणातील पाण्याची पातळी १७५.३० मीटर इतकी नोंदवली आहे.पाण्याची पातळी वाढल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नदीलगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांना दवंडी व अन्य माध्यमातून पूर्वसूचना द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. नदीकाठावर काम करणारे शेतकरी, मासेमार, पशुपालक व रेतीघाटातून रेती काढणारे यांनी खबरदारी घ्यावी आणि नदीकाठावर जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.वाढीव पाणीसाठ्याचा धोका असलेली गावे पुढीलप्रमाणे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील:
कुरूड, रामपूर, विसापूर, निमगाव, खोर्दा, हिवरगाव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै.), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगाव, फराडा, डोटकुली, डोंगरगाव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल.
चंद्रपूर जिल्ह्यातील:
हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगाव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगाव, कापसी, उपरी.गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी नागरिकांना अपेक्षित सतर्कता राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Back to top button