वेळेवर क्रिटिकल केअरमुळे पारसलगुंडीतील महिलेचे प्राण वाचले

गडचिरोली, प्रतिनिधी :—
दुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा किती मोलाच्या ठरू शकतात, याचे जिवंत उदाहरण हेडरी येथील लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (LMEL) येथे पाहायला मिळाले. वेळेवर मिळालेल्या प्रगत क्रिटिकल केअर उपचारांमुळे पारसलगुंडी गावातील एका मध्यमवयीन महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला ऑर्गेनोफॉस्फरस विषबाधा झाल्याने ती २८ डिसेंबर २०२५ रोजी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती. श्वसनास तीव्र त्रास, फुफ्फुसांमध्ये गंभीर गुंतागुंत आणि अत्यंत चिंताजनक प्रकृतीमुळे तात्काळ आपत्कालीन उपचार सुरू करण्यात आले.
डॉक्टरांनी तत्काळ विषबाधेचे निदान करून रुग्णाला इंट्यूबेट करून आयसीयूमध्ये दाखल केले व मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रुग्ण दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर असल्यामुळे पुढे ट्रॅकिओस्टॉमी करावी लागली.
सुमारे १५ दिवस रुग्ण आयसीयूमध्ये उपचाराखाली होती. या कालावधीत विषबाधेच्या दुष्परिणामांमुळे मेंदू, हृदय व फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाला. तिला तीव्र फुफ्फुस सूज (Acute Pulmonary Edema) तसेच सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया (SVT) चे दोन झटके आले, ज्यामुळे तिची प्रकृती अनेक वेळा अत्यंत नाजूक बनली होती. या काळात सतत निरीक्षण व उच्चस्तरीय क्रिटिकल केअर देणे आवश्यक ठरले.
सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही रुग्णाने हळूहळू उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे तिला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर आवश्यक सल्ल्यासह तिला घरी सोडण्यात आले.
या संपूर्ण उपचार प्रक्रियेचे नेतृत्व मेडिसिन तज्ज्ञ डॉ. चेतन, भूलतज्ज्ञ डॉ. धीरज आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. महेंद्र यांनी केले. उपचारांचे समन्वय वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांचे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच संचालिका श्रीमती कीर्ती रेड्डी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे दर्जेदार आरोग्यसेवा शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा यशस्वी उपचारप्रसंग वेळेवर उपचार, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित टीमवर्क यांच्या जोरावर दुर्गम व वंचित भागातही गंभीर रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हे अधोरेखित करतो.



