राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान ३ फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुले

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध अमृत उद्यान ३ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आहे. आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत अमृत उद्यानाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.
अमृत उद्यान आठवड्यातील सहा दिवस, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहील. देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव प्रत्येक सोमवारी उद्यान बंद राहणार असून होळीच्या निमित्ताने ४ मार्च रोजीही उद्यान बंद राहणार आहे.
विशेष दिवस
अमृत उद्यान काही विशेष श्रेणीतील नागरिकांसाठी खालील तारखांना खुले राहील –
• ३ मार्च – संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी
• ५ मार्च – ज्येष्ठ नागरिकांसाठी
• १० मार्च – महिला व आदिवासी महिला स्वयं-सहायता गटांसाठी
• १३ मार्च – दिव्यांग नागरिकांसाठी
उद्यानात प्रवेश पूर्णपणे मोफत असून नागरिकांना केवळ ऑनलाइन बुकिंग करणे बंधनकारक आहे. बुकिंगसाठी
👉 https://visit.rashtrapatibhavan.gov.in/
या संकेतस्थळाचा वापर करता येईल. यावर्षी प्रत्यक्ष ठिकाणी बुकिंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व अभ्यागतांचा प्रवेश आणि निर्गमन राष्ट्रपती भवन परिसरातील गेट क्रमांक ३५ येथूनच होईल. अभ्यागतांच्या सोयीसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानक ते गेट क्रमांक ३५ दरम्यान सकाळी ९:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दर ३० मिनिटांनी शटल बस सेवा उपलब्ध राहील. शेवटची शटल बस सायंकाळी ४ वाजता सुटेल.
उद्यानात भेट देताना मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक चाव्या, पर्स/हँडबॅग, पाण्याच्या बाटल्या तसेच तान्ह्या बाळांसाठी दूधाची बाटली नेण्यास परवानगी असेल. पिण्याचे पाणी, शौचालये आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अमृत उद्यानासोबतच नागरिक आठवड्यातील सहा दिवस (मंगळवार ते रविवार) राष्ट्रपती भवन व राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतात. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



