चंद्रपूर, प्रतिनिधी :-
झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी केंद्रीय पदाधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक व कवी दिवंगत आचार्य ना. गो. थुटे यांच्या निधनानिमित्त झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर शहर शाखा तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद यांच्या वतीने आभासी पद्धतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. वयोमानानुसार झालेल्या त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आचार्य थुटे यांच्या साहित्यसेवेचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे चिटणीस अॅड. राजेंद्र जेनेकर (राजुरा), डॉ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर), श्रीकांत धोटे (अमरावती), यमाजी गाऊत्रे (तेलंगणा), मनोहर बोबडे, विनायक सोयाम, ग्रामगीता परीक्षा विभागाचे सुभाष पावडे, डॉ. धर्मा गावंडे, नामदेव गेडकर (चंद्रपूर), राजुरा तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे (देवाडा), मुल शाखेचे ग्रा. नामदेव पिज्दूरकर, ग्रा. सुखदेव चौथाले, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख अरुण झगडकर (गोंडपिपरी), वरोरा शाखेचे अध्यक्ष ग्रा. पंडित लोंढे, गडचिरोली शाखेचे उपेंद्र रोहणकर, ग्रा. नत्थुजी चिमूरकर, खेमदेव हस्ते आदींनी आपल्या भावना व्यक्त करत आचार्य थुटे यांच्या साहित्य, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
सर्व वक्त्यांनी त्यांच्या साध्या, संवेदनशील आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाचा विशेष उल्लेख केला. झाडीबोलीच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले. श्रद्धांजली सभेचा समारोप दोन मिनिटे मौन पाळून करण्यात आला.
Back to top button