आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीतील चार उपसा सिंचन योजनांना मंजुरी; ४८ गावांतील ९,५७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

गडचिरोली, प्रतिनिधी : –
गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन सुविधांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने चार महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील ४८ गावांमधील सुमारे ९ हजार ५७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेती उत्पादनवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी आपण मुख्यमंत्री कार्यालय, जलसंपदा विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, असे डॉ. नेते यांनी सांगितले.
मंजूर झालेल्या योजनांमध्ये सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली आणि रमेशगुडम उपसा सिंचन योजना, मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम उपसा सिंचन योजना तसेच चामोर्शी तालुक्यातील राजीव-चिंचोड उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे.
या योजनांपैकी रंगायपल्ली योजनेचा लाभ १४ गावांना, रमेशगुडम योजनेचा लाभ ५ गावांना, शांतीग्राम योजनेचा लाभ १५ गावांना तर राजीव-चिंचोड योजनेचा लाभ १४ गावांना होणार आहे. एकूण ७२२.९५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांच्या शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळणार आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यात सिंचनाच्या मर्यादित सुविधांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या योजनांमुळे शेती उत्पादनात वाढ होण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास डॉ. नेते यांनी व्यक्त केला.




