मुलचेरा, प्रतिनिधी :-
मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी केलेल्या मागणीची दखल घेत विद्युत विभागाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपचे साहित्य पोहोचविले आहे.
पात्र शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन भरली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही सोलर पंप बसविण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत पेंदाम यांनी आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने पंप बसविण्याची मागणी केली होती.
सोलर पंप बसविण्यास विलंब झाल्यास आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पेंदाम यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर विभागाने साहित्य पोहोचविले असून लवकरच शेतात सोलर पंप बसविण्यात येणार आहेत.
लाभार्थी भुरू गंगा पेंदाम, गुरुदास गोविंदा सेडमेक यांच्यासह एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी या पाठपुराव्याबद्दल भाई चिरंजीव पेंदाम यांचे आभार मानले आहेत.
Back to top button