गडचिरोली, प्रतिनिधी :-
मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया मार्गासोबतच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील प्रमुख औद्योगिक व आर्थिक केंद्रांशी थेट, जलद व सुरक्षित संपर्क प्रस्थापित होणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
याच बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नवेगाव–मोरे–कोनसरी–मूलचेरा–हेडरी–सुरजागड या मार्गाच्या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या चारपदरी सिमेंट काँक्रिट महामार्गास मंजुरी देण्यात आली. हा मार्ग सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे वाहतूक सुरक्षितता वाढण्यासह अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे ठोस निर्देश दिले. कोणताही प्रकल्प विनाकारण रखडू नये, तसेच प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रशासकीय मंजुरी, पर्यावरणीय परवानग्या व तांत्रिक बाबी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाचा विस्तार तसेच सुरजागड मार्गाच्या चारपदरीकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, खनिज आधारित उद्योग, वाहतूक सुविधा आणि एकूणच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button