ताज्या घडामोडी
महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी 16,000 कोटी -नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर,प्रतिनिधी :-
पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल . केंद्रीय रस्ते निधी -सीआरएफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये 1 ,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केली .
महारेल या महाराष्ट्र शासन तसेच रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सुमारे 306 कोटी रुपयांच्या 6 उड्डाणपूलांचे (आरओबी )लोकार्पण तसेच 600 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज अजनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते संपन्न झाला . त्यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुरदृश्य प्रणालीव्दारे संबोधित केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
मंजूर केलेल्या 25 आरओबी मध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकावरील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज करण्यात आले . या संदर्भात माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की, अजनीचा हा पूल ब्रिटिशकालीन असून तो 1927 मध्ये बांधला गेला होता. या पूलावरील जड वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आता बंद केली असून महाराष्ट्र शासनाने महारेलच्या माध्यमातून येथे तीन लेन चा दुहेरी ब्रिज मंजूर केला असून याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे फुटपाथ देखील मंजूर केले आहेत. या पुलावर होणाऱ्या एलईडी लाइट्सच्या सुशोभीकरणामुळे हा ब्रिज एक ‘आयकॉनिक ‘ ब्रिज ठरणार असून त्यांनी या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. अजनीच्या पुलाव्यतिरिक्त अमरावती – बडनेरा, अमरावती – निंभोरा, अमरावती -नरखेड या अमरावती जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड, यवतमाळ जिल्ह्यातील वणी – वरोरा ,मांजरी ते पिंपळखुटी सेक्शन अशा एकूण 5 आरओबीचे आज भूमिपूजन करण्यात आले. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतवारी सेक्शन, डेप्टी सिग्नल,दिघोरी ते इतवारी, नाईक तलाव ते बांगलादेश या आरोबींचं त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, लातूर ,बुलढाणा जिल्ह्यातील काही आरोबीच्या बांधकामाला देखील मंजुरी देण्यात येत आहे अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
केंद्रीय रस्ते निधी मधूनच नागपूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे 500 कोटी रुपयांच्या तरतुदीची नवीन कामांची घोषणा सुद्धा गडकरी यांनी याप्रसंगी केली. या कामांमध्ये प्रामुख्याने झिरो माइल-टेकडी-ते सायन्स कॉलेजचा अंडरपास, राधे मंगलम कार्यालय -रिंग रोड ते ऑरेंज सिटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, शताब्दी चौक ते मनीष नगर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण,मंगलमूर्ती चौक ते जयताळा लास्ट बस स्टॉप रस्त्याचे सिमेंटीकरण, चौधरी मेडिकल -झिंगाबाई टाकळी ते अवस्थी नगर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, शंकरपूर-मिहान-चिंचभवन रस्त्याचे सिमेंटीकरण, प्लायवुड ते भेंडे लेआउटची सुधारणा, एअरपोर्ट ते एचबी टाउन चे सिमेंटीकरण बोरगाव चौक ते गोरेवाडा येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, बुटीबोरी उमरेड रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण,वाडी-खडगाव-लावा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव-इसापूर येथील पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.




