आपला जिल्हा

“शिक्षण समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम” – आमदार सुधाकर अडबाले

समता सोसायटी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून विविध स्पर्धा परीक्षा व कौशल्याधिष्ठित क्षेत्रात सहभागी होणे आवश्यक आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

समता सोसायटी फॉर एज्युकेशन अ‍ॅण्ड स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने श्रमिक पत्रकार भवन, चंद्रपूर येथे गुणवंत विद्यार्थी, यशस्वी पालक, तसेच माजी प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अडबाले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. कार्यक्रमात प्राचार्य राजरत्न वानखेडे (बल्लारपूर) व प्राचार्य संजय तेलतुंबडे (वणी), नामदेव गेडकर, श्रीमती श्यामलता गेडकर, श्रीमती तेलतुंबडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या सोहळ्यात एन. एन. गेडकर यांनी संकलित केलेल्या “बुद्ध-भीम गीतसंग्रह” या गीतपुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल गेडकर दाम्पत्याचा सत्कार आमदार अडबाले यांच्या हस्ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना बंडोपंत बोढेकर म्हणाले, “बुद्ध-भीम तत्वज्ञानावर आधारित गीतसंग्रह प्रेरणादायी असून, गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गौरव हा समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे.”

प्राचार्य वानखेडे आणि प्राचार्य तेलतुंबडे यांनीही गेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे योगदान मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे तर आभारप्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, जाणिव विचारपीठ, झाडी बोली साहित्य मंडळ, अभिजात सार्वजनिक वाचनालय, मिलेनियम ग्रुप व पद्मराज जीएफआर चॅप्टर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

या वेळी समाजबांधव, धम्मचारी, कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker