आपला जिल्हाताज्या घडामोडी

२७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा होणार

२२ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर उभारलेल्या गडचिरोलीच्या कारगिल स्मारकात शहीदांना मानवंदना

गडचिरोली, प्रतिनिधी :-

            कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी २७ वा कारगिल विजय दिवस रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली, कारगिल स्मारक समिती तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

गडचिरोलीतील कारगिल स्मारक हे जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जाते. या स्मारकाच्या उभारणीसाठी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांनी सन 2000 पासून तब्बल २२ वर्षे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि अथक प्रयत्न केले. त्यांच्या या दीर्घ संघर्षानंतर गडचिरोली शहरात शहीद वीर जवानांच्या स्मृती जपणारे हे स्मारक 2022 ला साकार झाले. आज या कारगील चौक येथे  दरवर्षी कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना मानवंदना मागील 26 वर्षा पासून अर्पण केली जाते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता इंदिरा (गांधी) चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कारगिल विजय रॅलीने होईल. ही रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकापर्यंत जाईल. त्यानंतर शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक एम. रमेश (भा.पो.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते,हिम्मतसिंह बेडला (निवासी संचालक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.), ले. कर्नल रामनाथ स्वामी, कृष्णा रेड्डी, रतिकांता साहू, नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर,होमराज डोनाळकर तसेच कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक
– सकाळी ८.०० वा. – कारगिल विजय रॅली (इंदिरा/गांधी चौक ते कारगिल चौक)
– सकाळी ९.०० वा. – मान्यवरांचे आगमन
– सकाळी ९.०५ वा. – शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण व मानवंदना
– सकाळी ९.१० वा. – वीर कुटुंबीय व माजी सैनिकांचा सत्कार
– सकाळी ९.४० वा. – मान्यवरांचे मार्गदर्शन
– सकाळी १०.३० वा. – वंदे मातरम् व कार्यक्रमाची सांगता

या कार्यक्रमास शहरातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वीर जवानांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन कारगिल स्मारक समितीचे प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, सुनील देशमुख, प्रकाश धकाते, डॉ. बिडकर, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, निलीमा देशमुख माजी सैनिक सुभेदार मेजर ऋषी वंजारी (से.नि.), श्री ईश्वरजी राऊत (से.नि. सैनिक तथा नायब तहसिलदार), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), हवालदार कैलास सिडाम (नि.) तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली आणि समस्त आजी-माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker