महाराष्ट्रसाहित्यिक

जीवनाला मार्गदर्शक करणारा अभंगगाथेसारखा दुसरा वाटसरू नाही-डॉ. नंदकुमार मोरे 

गोंडवाना विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या वतीने शिबीर

गडचिरोली, प्रतिनिधी :-

“संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा जीवनाला मार्गदर्शन करते. जीवनातील वैफल्य, निरागसता, निष्क्रियता आणि निष्फळता दूर करण्याचे सामर्थ्य अभंगगाथेत आहे. तुकाराम गाथेसारखा दुसरा वाटसरू सुद्धा नाही. rराष्ट्रपिता महात्मा गांधीना संत तुकारामांचे अभंग प्रिय होते. त्यांना आवडणाऱ्या निवडक शंभर अभंगाचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर करून घेतले होते.” अशा शब्दात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी संत तुकारामाच्या अभंगगाथेचा गौरव केला.

      गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या वतीने १७ ऑगस्ट २०२४ रोजी शिबिर तीन विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या प्रबोधन शिबिराच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाचे प्र कुलगुरू, डॉ. श्रीराम कावळे, यांच्या हस्ते झालेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी नवी दिल्ली चे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनराज पाटील तथा मराठी विभागाचे समन्वयक डॉ.श्याम खंडारे, तसेच प्रबोधन शिबिराचे संयोजक डॉ. हेमराज निखाडे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. नंदकुमार मोरे यांनी कोल्हापूर विद्यापीठाने प्रकाशित केलेली दोन खंडातील संत तुकारामाची अभंगगाथा प्र-कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाला भेट दिली. संत तुकाराम महाराज यांच्या कार्याची समकालीन प्रस्तुतता’ या विषयावर बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की, ‘संत तुकाराम महाराजापासून प्रेरणा घेऊनच शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला मार्गदर्शन केले आणि गोरगरीब वंचितांच्या हिताची भूमिका घेतली.

दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक राणा यांनी संत तुकाराम यांचा विदर्भातील संतांच्या विचारांवर कसा प्रभाव आहे, या विषयावर मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गणपती महाराज यांनी मांडलेल्या बुद्धीप्रमाण्यवादी विचारांची आणि त्यांच्या विषमता विरोधी कार्याची प्रेरणा संत तुकारामांचे अभंग हीच होती, असे प्रतिपादन केले.

तिसऱ्या सत्रात प्रवचनकार श्री. अशोक सरस्वती यांनी वारकरी संतांच्या कीर्तन शैलीवर आधारित आधुनिक विचारांच्या प्रवचनाचे प्रात्यक्षिक केले. तत्कालीन काळात संस्कॄतातील गीता संत ज्ञानेश्वरांनी मराठी सारख्या बहुजनांच्या भाषेत आणली, ही क्रांती होती. त्या क्रांतीचा गजर संत तुकाराम यांनी केला. म्हणून आजचे परिवर्तनवादी सुधारक आपले विचार मांडू शकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थित संत तुकाराम महाराज यांनी अभंगांची निर्मीती केली. त्यांच्या अभंगांमधून आजही सामाजिक विषमता नष्ट करण्याची प्रेरणा मिळते.

चौथ्या आणि समारोपाच्या सत्रात डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुकाराम अध्यासनांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर सविस्तर प्रतिपादन केले. विद्यापीठ ज्या परिसरात असते, त्या परिसरातील सामाजिक प्रश्न, भौगोलिक पर्यावरण आणि सांस्कृतिक परंपरांचे समन्वयन करण्याची जबाबदारी त्या विद्यापीठाची असते. गोंडवाना विद्यापीठ विविध उपक्रम राबवून ती जबाबदारी पार पाडत आहे, याचे समाधान आहे. अभ्यासक्रमाच्या चौकटीत ना मावणारे उद्दिष्ट संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतात असे ते म्हणाले.

  • शिबिराचे प्रास्ताविक डॉ. हेमराज निखाडे आणि सूत्रसंचालन डॉ.नीलकंठ नरवाडे यांनी केले.डॉ.सविता गोविंदवार यांनी मानले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker