आपला जिल्हा

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : डाव्या पक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात हाहाकार माजवला असून जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेले धान सडल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. या परिस्थितीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या मागणीचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, “मागील १५ ते २० दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे हलक्या-मजव्या धानाचे नुकसान झाले होते. मात्र सध्याच्या मुसळधार पावसाने कापणी केलेले धान पूर्णपणे भिजल्याने ते जनावरांसाठी तण म्हणूनही उपयोगी राहिलेले नाही. अशा स्थितीत पंचनामे आणि शासकीय सोपस्कारांची प्रतीक्षा न करता शासनाने तातडीने गडचिरोली जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून, केंद्र सरकारच्या आपदा नियमांनुसार शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य अशोक किरंगे, तालुका चिटणीस चंद्रकांत भोयर, तसेच भाकपचे शहर सचिव काॅ. संजय वाकडे यांचा समावेश होता.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker