राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारक्रांती संमेलनाचे उद्घाटन शनिवारी, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार कोवा लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखिका तथा विचारवंत अॅड. पारोमिता गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शनिवारी सकाळी राष्ट्रसंत साहित्य दिंडी हनुमान मंदिर ते संमेलन स्थळ अशी काढण्यात आली. या दिंडीत शेकडो साहित्यिक व राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य गोपालराव कडू (केंद्रीय प्रचारप्रमुख, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम), ग्रामगीताचार्य तथा संयोजक बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रपूर, ग्रामगीताचार्य पंढरीनाथ चंदनखेडे (गोवंश अभ्यासक, पुणे), नाईनी मधुकरजी ठाणेदार (पोलीस स्टेशन केरामेरी), प्रभाकर नवघरे (माजी स्वागताध्यक्ष, सांगडी), अनुप श्रीरामे (फिल्म निर्माते, शंकरपूर-चिमूर), आनंदराव आत्राम (सरपंच, गोयेगाव) तसेच स्वागताध्यक्ष रमेश सोनुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक परिवर्तन, ग्रामविकास आणि साहित्यिक चळवळींचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संमेलनात विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्वान, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार व समाजप्रबोधन घडवून आणण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अॅड. राजेंद्र जेनेकर (राजुरा) यांनी केले, तर आभार इंजि. विलास उगे (नागपूर) यांनी मानले.