ताज्या घडामोडीदेश विदेश
महात्मा गांधींचे विचार आजही समाजाला सुसंगत व पथदर्शी – डॉ. अंबादास मोहिते
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे उद्घाटन थाटात

गडचिरोली, प्रतिनिधी :-
महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आजही स्वातंत्र्यपूर्व काळाइतकीच आहे. त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. महापुरुषांना जाती-धर्मात विभागून न पाहता त्यांच्या विचारांचा स्वीकार केला पाहिजे, कारण गांधीजींचे विचार आजही समाजाला सुसंगत व पथदर्शी आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे सदस्य व नामवंत समाजशास्त्रज्ञ डॉ. अंबादास मोहिते यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ. मोहिते बोलत होते.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. विशेष अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोर्लावार, विश्वशांतीदूत प्रकाश अर्जुनवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अंबादास मोहिते यांनी गांधीजींचे सर्वोदय, अंत्योदय, नई तालीम, ग्रामस्वराज्य, सत्य आणि अहिंसा या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. गांधीजींच्या विचारांचा समाजातील शांतता, समता आणि विकासासाठी आजही मोठा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
अध्यासन केंद्राचा उद्देश
या केंद्राच्या माध्यमातून गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता, ग्रामविकास आणि नैतिक मूल्यांवर आधारित संशोधनाला चालना दिली जाणार आहे. तसेच समकालीन सामाजिक प्रश्न, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय, शांतता आणि मानवतावादी दृष्टिकोन यांवर आधारित संशोधन प्रकल्प, व्याख्याने, परिसंवाद आणि विस्तारकार्य राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक विकासासाठी उपयुक्त संशोधन व जनजागृतीचे कार्य या केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जाणार आहे.



