तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे समुद्रात बुडून महाराष्ट्रातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीचा समावेश असून, तिचा मृतदेह स्थानिक प्रशासनाला आढळून आला आहे.
माहितीनुसार, महाराष्ट्रातील १५ तरुण-तरुणी आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी Cognizant मध्ये इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. काल सुट्टीचा दिवस असल्याने हा गट Golden Beach (पुडुचेरी रोड परिसर) येथे फिरण्यासाठी गेला होता.
दरम्यान, समुद्रात अचानक १० ते १५ फूट उंच लाटा उसळल्या. तरुणांचा गट सेल्फी घेत असताना आलेल्या प्रचंड लाटेत तिघे जण वाहून गेले. स्थानिक बचाव पथकाने शोधमोहीम राबवली असता कु. मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) यांचा मृतदेह सापडला. उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
या घटनेने भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने तामिळनाडू प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत सुरू केली असून, पीडित कुटुंबीयांशी सतत संपर्क ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या सूचना व इशारे पाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे इंटर्नशिपसाठी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.