आपला जिल्हाताज्या घडामोडीसाहित्यिक

कवयित्री किरण चौधरी यांना दुहेरी सन्मान

झाडीबोली नारीशक्ती व भारतीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान

ब्रह्मपुरी, प्रतिनिधी :-

झाडीबोली साहित्य मंडळ शाखा ब्रह्मपुरी यांच्या वतीने आयोजित झाडीबोली प्रिमियर लीग स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, कवी आणि रसिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनराज खानोरकर, डॉ. संजयकुमार निंबेकर, प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, नगरसेवक राकेश पडोळे, जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, कवी लक्ष्मण खोब्रागडे तसेच गणेश कुंभारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख संतोष मेश्राम व सचिव धनंजय पोटे यांनी केले.

यावेळी बोलताना बंडोपंत बोढेकर यांनी साहित्य हे समाजातील जनजागृतीचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य साहित्यिक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात झाडीबोली प्रिमियर लीग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “नारीशक्ती पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी प्रा. रत्नमाला भोयर (मुल), अर्चना खंडाते, कल्पना गेडाम, डॉ. विद्या शेळके (ब्रह्मपुरी), सविता धमगाये (नागपूर), उज्वला उसेंडी (कोरची) आणि कवयित्री सौ. किरण महादेव चौधरी (गडचिरोली) यांचा समावेश होता. सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान, कवयित्री सौ. किरण महादेव चौधरी यांच्यासाठी ८ मार्च २०२६ हा दिवस विशेष ठरला. ब्रह्मपुरी येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने त्यांना “झाडीबोली नारीशक्ती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच साहित्यिक व सांस्कृतिक मंच, मुंबई यांच्या वतीनेही त्यांना “भारतीय नारीशक्ती पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात प्रा. रत्नमाला भोयर यांच्या “संत तुकाराम” या पुस्तकाचे तसेच गुलाब बिसेन यांच्या “वायगावची शाळा” या बालकविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांवर कवी अरुण झगडकर यांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर धनंजय पोटे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी झाडीबोली प्रिमियर लीग स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रवीण किलनाके, दिनेश कुमार अंबादे, डॉ. अल्का दूधबुरे, अंजुमन बानो, वृषाली चोरे, नीरज आत्राम, संजय बिसेन, मधुकर दुफारे, जगदीश मुनघाटे, सुनील बावणे आदींना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कविसंमेलन पार पडले. “झाडीचा फुलोरा” या काव्य मैफलीचे आयोजन विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कविसंमेलनात निधी बनसोडे, ज्योत्स्ना बनसोडे, यामिनो मडावी, सुखदेव चौथाले, संजय बोरकर, संजय बिसेन, उपेंद्र रोहणकर, वृंदा पगडपल्लीवर, संगीता बांबोळे, रंजना चौधरी, रोशनी दाते, प्रीती चांहदे, नथुजी चिमुरकर, परमन्नद तिराणिक, वंदना सोरटे, नरेंद्र गंधारे (हिंगणघाट) आदी कवी-कवयित्रींनी आपल्या काव्यरचना सादर करून रसिकांची मने जिंकली.

साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker