गडचिरोली, प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. हा सप्ताह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरांमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी दिली.

जनसेवा सप्ताहाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
२२ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन – प्रत्येक तालुका व शहरात शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी १००१ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून “हरित महाराष्ट्र”, “वृक्ष माझी सावली”, “दादांची दृष्टी” आणि “हरित सृष्टी” या संकल्पनांवर आधारित वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल.
२३ जुलै : आरोग्य सेवा दिन – आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे व विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
२४ जुलै : सामाजिक बांधिलकी दिन – महापुरुषांच्या स्मारकांची व एसटी स्थानकांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. तसेच महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किमान तीन महिलांचा ‘अजितदादा महिला सक्षमीकरण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येईल.
२५ जुलै : कृषी सन्मान दिन – प्रगतिशील महिला व पुरुष शेतकऱ्यांपैकी किमान दोन शेतकऱ्यांचा ‘मा. अजितदादा कृषी सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात येईल.
२६ जुलै : युवा संकल्प दिन – युवक आघाडीच्या वतीने विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व माजी खेळाडूंचा ‘मा. अजितदादा क्रीडा रत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येईल.
२७ जुलै : अल्पसंख्याक सेवा संकल्प दिन – अल्पसंख्याक समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांचा ‘अल्पसंख्याक समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येईल.
२८ जुलै : सेवा उपक्रम – तालुका व शहरातील महिला व बाल रुग्णालयांमध्ये किमान १०१ रुग्णांना फळवाटप करण्यात येईल.
जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सर्व तालुका व शहर पदाधिकाऱ्यांना हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले असून, प्रत्येक कार्यक्रमाची स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्धी करून त्याची कात्रणे जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button