आपला जिल्हा

वसंत विद्यालयातर्फे आषाढी एकादशी निमित्त गडचिरोलीत भव्य वारी

विद्यार्थ्यांचा भक्तिरसात रमले गडचिरोलीकर

गडचिरोली, प्रतिनिधी:-

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अनमोल ठेवा जपण्याच्या हेतूने चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथे आषाढी एकादशीच्या पावन दिवशी भव्य वारीचे आयोजन करण्यात आले. या भक्तिमय वारीत शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवून विठ्ठलनामाचा जयघोष केला.

वारीचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. “विद्यार्थ्यांना लहान वयातच वारकरी संप्रदायाची माहिती व्हावी, भक्तीची व संस्कृतीची बीजे मनामनात रूजावीत,” या उद्देशाने संपूर्ण शाळा व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

 वारीची सुरुवात आणि भक्तिपूर्ण वातावरण

वारीच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “पांडुरंग विठ्ठल” या अभंगांच्या गजरात वातावरण पवित्र झाले. विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळस ठेवून विठ्ठल-रुक्मिणीची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी फुगडी खेळून आणि मुलांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचत भक्तिरसात रंग भरला.

जयघोष आणि वेशभूषेने रसिक मंत्रमुग्ध :-

वारी दरम्यान “जय हरी विठ्ठल”चा गजर सातत्याने घुमत राहिला. ढोलकी, टाळ, मृदुंग यांच्या तालावर पाय आपोआप थिरकले. विद्यार्थी रंगीत फेटे, धोतर, साडी, डोक्यावर तुळस घेत पांडुरंगाच्या भक्तीत दंग झाले होते. काही मुलांनी ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारली. रस्त्यावरील नागरिकांनीही वारीचं दर्शन घेत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.

वारीचा मार्ग :-

वारीचा मार्ग वसंत विद्यालयातून सुरू झाला. गांधी चौक, बाजारवार्ड, कारगिल चौक, हनुमान वार्ड, त्रिमूर्ती चौक, गुजरी वार्डातील विठ्ठल मंदिर येथे वारीने मुक्काम केला. त्यानंतर रविदास चौक व आरमोरी रोड मार्गे पुन्हा विद्यालयात वारी परतली. प्रत्येक चौकात विद्यार्थी थांबून भजन-कीर्तन करीत होते.

शाळा आणि शिक्षकांचा सक्रिय सहभाग

या वारीत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  सतीश धाईत,  मंदूरकर, रामटेके, चहांदे, पुरी,  मेघश्याम लांजेवार, वरखडे,  दब्बा, कु. मीरा बिसेन, कु. सुरपाम, कु. कन्नाके, कु. ठाकरे, कु. पाचभाई, उदय धकाते, श्री. सचिन धकाते, राकेश हेडाऊ, श्रीमती विभा गावतुरे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्वच वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

मुख्याध्यापिका सौ. कामडी यांच्या प्रेरणेतून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक कार्यक्रमाची आखणी केली. वारीच्या मार्गावर विद्यार्थ्यांची सुरक्षा व शिस्त याकडे विशेष लक्ष देण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप आणि खाऊ वाटप

वारी परतल्यानंतर विद्यालयात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक आणि शिक्षकवृंद यांनी समाधान व्यक्त केले.

 सांस्कृतिक वारशाचे संवर्धन :-

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात भक्तीची, एकतेची, संस्कृतीची जाणीव निर्माण झाली. “आजच्या पिढीने या परंपरांचे जतन करणे गरजेचे आहे,” असे मत अनेक मान्यवर नागरिकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत असून शाळेच्या या उपक्रमाचे अभिवादन करण्यात येत आहे.

oplus_0

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker