आपला जिल्हाताज्या घडामोडी
फसवणूक प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी महिलांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू
चार महिला रुग्णालयात भरती

गडचिरोली, प्रतिनिधी :-
अगरबत्ती प्रकल्प, ट्रॅक्टर खरेदी-विक्री तसेच चिचडोह बॅरेज जमीन नोंदणी प्रकरणातील कथित फसवणुकीविरोधात पीडित महिलांचे आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. चामोर्शी येथील काही गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. चार महिला रुग्णलयात भरती झाल्यावर आहेत.
आंदोलकांचा आरोप आहे की, भाजपाचे नगरसेवक आशिष पिपरे व नगरसेविका सोनाली पिपरे यांनी विविध योजनांच्या नावाखाली अनेकांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फसवणूक केली. राजकीय दबाव व वरिष्ठ नेत्यांची नावे वापरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, २०२० पूर्वी कर्जबाजारी स्थिती असताना गेल्या काही वर्षांत मोठी संपत्ती उभी करण्यात आली. ट्रॅक्टर व्यवहार, अगरबत्ती प्रकल्प तसेच चिचडोह बॅरेज जमीन संपादन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. एका शेतकऱ्याच्या अंधत्वाचा फायदा घेत कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेऊन चार लाख रुपयांची रक्कम वसूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या संदर्भात शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली, तसेच नागपूर येथील जनता दरबारातही तक्रार करण्यात आली; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संबंधित पत्रव्यवहार जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
२३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या उपोषणादरम्यान काही महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने चौकशी करून न्याय न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे.



