गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या वतीने गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासोबत पक्षीय संघटन बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या परिषदेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी कार्यक्रम, प्रलंबित प्रश्न तसेच विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाशी थेट संवाद वाढवून पक्षीय संघटन अधिक मजबूत करण्यावर आणि शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
या पत्रकार परिषदेतून आदिवासी भागात पक्षाची संघटन वाढ आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button