तिवसा, प्रतिनिधी :-
मानवतेचे महान पुजारी, विश्वबंधुत्वाचे प्रणेते आणि ‘ग्रामगीता’ या युगग्रंथाचे रचनाकार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी विचारांचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, या मागणीसाठी मुकुंद पुनसे, रमेश बोके, शफीक शहा, मनोहर साबळे, जयकुमार बोके, हैबतराव गाडगे आणि जगनराव भक्त यांनी तिवसा तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
ही मागणी केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानापुरती मर्यादित नसून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या मानवता, समता, बंधुता, ग्रामविकास आणि सामाजिक प्रबोधनाच्या विचारांचा राष्ट्रीय गौरव करण्याची मागणी असल्याचे विचार मंचाच्या वतीने सांगण्यात आले.
शासनाने भावनांचा आदर करावा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या विचार व कार्यातून समाजाला एकतेचा, स्वावलंबनाचा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या साहित्य व समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गुरुदेव भक्तांच्या भावनांचा आदर करून केंद्र शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ जाहीर करावा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष अमर वानखडे यांनी केले.
यावेळी राजेंद्र मोहितकर गुरुजी, विकास बोरवार, पवन खरासे, रोशन ठाकरे, कुणाल राऊत, विनोद बोराळकर आणि नामदेवराव ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते व गुरुदेव भक्त उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button