महाराष्ट्र

कोनसरी येथे  जनसुनावणीत डमी जनप्रतिनिधी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

           आज दिनांक 7 जुलाई 2023 रोजी चामोर्शी तालुक्यात असलेल्या कोनसरी येथे लॉयड मेटल कंपनीकडून पर्यावरणासंदर्भात लोकांचे अभिप्राय घेण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. ज्यात या भागातील वेगवेगळ्या लोकांनी आपल्या पर्यावरणासंदर्भात व इतर बाबतीत तक्रारी तसेच मागण्या मांडल्या होत्या. मात्र त्यामध्ये ज्या प्रतिनिधींनी आपल्या भूमिका मांडल्या त्या कंपनीकडून डमी स्वरूपाच्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या. ज्यामुळे केवळ लोकांमध्ये खोट्या आश्वासनांचा भ्रम पसरवण्यात आलेला आहे असा खळबळ जनक आरोप स्थानिक युवक सुरज कोडापे यांनी केलेली आहे.

      जनसुनावणी प्री प्लान आणि स्क्रिप्टेड होती त्यामुळे या सुनावणीमध्ये खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे आणि इतर कोणतेही मुद्दे न्याय पद्धतीने मांडण्यात आलेले नाहीत त्यामुळे ही जनसुनावणी मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या कमिटीपुढे पुन्हा एकदा करण्यात यावी अशी मागणी स्थानिक मुधोली चक नं. २ या गावातील युवक सुरज कोडापे यांनी केलेली आहे

         या जनसुनावणीत मागण्या करण्यासाठी ज्या ग्राम प्रतिनिधींनी म्हणजेच सरपंच,ग्रामपंचायत सदस्य किंवा गावातील तरुण जनता असेल ह्या लोकांनी जाणीवपूर्वक कंपनीने दिलेल्या स्क्रिप्टच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले.थोडक्यात काय तर ह्या लोकांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दबाव आणून तसेच वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने देऊन कंपनी बद्दल केवळ चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीच बोलवल्या गेल्या आणि यामुळे जनसुनावणीसाठी आलेल्या लोकांमध्ये चुकीचा समज पसरवण्यात आलेला आहे हे निषेधार्य आहे.

         एखादी कंपनी किंवा उद्योग समूह ज्यावेळेस स्थापन होतो त्यावेळेस पर्यावरणाचा वेगवेगळ्या स्तराने नाश होतो आणि कंपनीमुळे पर्यावरणाच्या बाबतीत वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्या संदर्भात मात्र कोणत्याही व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात बोललं गेलं नाही. उलट या जनसुनावणीमध्ये कंपनी आणि तिचे काम कसे योग्य आहे हेच सांगण्यावर बहुतांश डमी प्रतिनिधींचा जोर दिसून आला.

पर्यावरणाचा विचार केल्यास भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्काच्या भागात अनुच्छेद 21 मध्ये जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यामध्ये स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार मेनका गांधी खटल्याने आपल्यासमोर मांडलेला आहे. मात्र येणाऱ्या काळात कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण होणार आहे आणि त्याच्यावर कोणतेही ठोस उपाय या लोकांनी जनतेला पटवून दिलेले नाही त्यामुळे जेव्हापर्यंत यावर ठोस उपाय कोणत्या प्रकारचे असतील हे कंपनीकडून स्पष्ट केले जाणार नाही तेव्हापर्यंत पुढच्या प्रक्रियेला स्थानिक लोकांकडून विरोधच होईल. यासाठी आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली तरीही आम्ही जनहित याचिकेच्या माध्यमातून या मागण्या लावून धरू. ही पर्यावरण विषयक जन सुनावणी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कमिटीसमोर न्याय पद्धतीने व्हावी अशी मागणी करत आहोत.

 सुरज रमेश कोडापे

प्रकल्प गावांतर्गत युवक

      

          आजच्या जनसुनावणी मध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून म्हणजेच कंपनीकडून केवळ लोकांना भ्रमात आणणाऱ्या आश्वासनांचा मारा करण्यात आला ज्या आश्वासनांचे शब्द कंपनीकडून देण्यात आले ते सहज पूर्ण होण्यासारखे नाही आहेत मात्र लोकांना विश्वासात घेण्यासाठी ह्या खोट्या गोष्टी जनसुनावणीच्या माध्यमातून कंपनीच्या अधिकाऱ्याकडून बोलण्यात आल्या जे निषेधार्य आहे.

           कंपनी स्थापन होताना वेगवेगळ्या प्रदूषणांना इथल्या स्थानिक लोकांना सामोरे जावे लागेल म्हणजेच वायु प्रदूषण होईल हवेचे प्रदूषण होईल ज्यामुळे इथल्या जनतेच्या, प्राण्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल मोठे मोठे श्वासाचे तसेच त्वचेचे आजार होतील. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक इथल्या जण सुनावणीमध्ये टाळल्या गेल्या.

         कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्या भाषणात लोकांना खोट्या आश्वासनांची रेलचेल दिली.सरळ सरळ त्यांनी काही शब्द,काही गोष्टी अशा बोलल्या ज्या पूर्णपणे अशक्य आहेत उदाहरणार्थ कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा शेतीला नुकसान होणार नाही किंवा आरोग्याला हानी पोहोचणार नाही इ. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी घडणार नाहीत अशा चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून बिंबवण्याचा प्रयत्न केला.

        मात्र वस्तुस्थिती पाहता आरोग्याच्या संदर्भात येणाऱ्या काळात या भागातील लोकांना सर्दीपासून ते फुफुसाचे आणि यकृताचे न बरे होणारे आजार होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या उपचाराची सुविधा या कंपनीकडे कोणत्याही प्रकारची असणार नाही. केवळ हॉस्पिटलचा उभारण्याचे गाजर दाखवण्यात आलेले आहे.मात्र त्यामध्ये मिळणाऱ्या उपचारासंदर्भात काहीही बोलण्यात येत नाही आहे.

           कंपनीच्या काही धोरणांमुळे किंवा झालेल्या प्रदूषणामुळे जर या भागातील शेतीचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्यासाठी कंपनीकडून कोणत्याही ठोस प्रकारच्या गोष्टीची वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे येणारा काळ इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी भयंकर असेल यामध्ये तीळमात्र शंका नाही.

       या कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकी गाव येत आहेत त्या गावांमध्ये कोनसरी गावातील नागरिकांचा मग तो रोजगाराच्या बाबतीत असो की कोणत्याही इतर बाबतीत वर्चस्व अधिक असताना दिसत आहे.जे समानतेच्या तत्वाचे भंग करत आहे. यामध्ये विशेष करून दलाली मोठ्या प्रमाणात चालते अशी स्थानिक ग्रामस्थांकडून वेळोवेळी तक्रार करण्यात आलेली आहे

       त्यामुळे कंपनीने यापुढे कोणतेही धोरण आखताना क्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांच्या ग्रामसभेला विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारचे निर्णय घ्यावेत अन्यथा कंपनीच्या कोणत्याही कार्यक्रमाला इतर गावांच्या लोकांकडून विरोध करण्यात येईल.     

   

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker