कृषी व व्यापार
पीक विमा नोंदणी करताना सेवा केंद्राकडून पिळवणूक तात्काळ थांबवा
मुंबई,विशेष प्रतिनिधी :-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करताना सामूहिक सेवा केंद्राकडून (CSC) शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक तात्काळ थांबविण्याचे आदेश अब्दुल सत्तार, कृषी मंत्री यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप २०२३ हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १/- रुपया विमा हप्त्यात त्यांचा पीकाचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या ९ विमा कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
खरीप २०२३ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२३ असा आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून होत असते. पीक विमा योजनेत सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून झालेल्या नोंदणीसाठी शेतकऱ्यामागे प्रति अर्ज रुपये ४०/- प्रमाणे रक्कम विमा कंपन्यांकडून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांना देण्यात येते असे आज शासनाच्या कृषी विभागाने पत्र काढून जाहीर केले आहे.
पीक विमा योजनेत नोंदणी करताना सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांनी शेतकऱ्याकडून विमा हप्त्यापोटी १/- रुपया घेऊन त्यांच्याकडून इतर कोणतेही शुल्क न स्विकारता विमा योजनेत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र असे असताना राज्यात विविध ठिकाणावरून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक हे शेतकऱ्याकडून १/- रुपया विमा हप्ता व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अब्दुल सत्तार, कृषी मंत्री यांनी कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्याकडून पीक विमा हप्ता पोटी जमा करावयाच्या १/- रुपया व्यतिरिक्त इतर रक्कम सामूहिक सेवा केंद्रामार्फत (CSC) घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी प्रत्येक सामूहिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायत, बाजार समिती या ठिकाणी अशा प्रकारची माहिती प्रदर्शित करावी. आपल्या जिल्ह्यात कोणी सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक अशा प्रकारे गैरवर्तणूक करत असेल तर त्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल मला पाठवावा असे कृषी विभागाच्या सर्व कार्यालयास कळविले आहे.
वाचकांचा कौल