चामोर्शी, प्रतिनिधी :-
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत गट ग्रामपंचायत घोट येथे केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेसाठी २२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र एवढा निधी खर्च होऊनही योजना प्रभावीपणे कार्यान्वित झाली नसल्याने नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची तक्रार आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक घरांना अर्धवट नळ जोडणी देण्यात आली असून नळकामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्त्यावर उघड्यावर असलेले वाल्व अपघातास कारणीभूत ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घोट, कर्दूळ, निकतवाडा, पेठ व नवेगाव या गावांसाठी उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना सलग एक महिना देखील सुरळीत चालली नसल्याने ती ‘पांढरा हत्ती’ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. प्रणय खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व स्थानिक नागरिकांनी केली असून यासंदर्भात विविध शासकीय स्तरावर तक्रार निवेदन देण्यात आले आहे.
Back to top button