गडचिरोली, प्रतिनिधी :-
जालना जिल्ह्यातील भोकरदन रोडवरील वरद फेरो अलॉयज प्रा. लि. या कंपनीच्या प्रस्तावित विस्तारित प्रकल्पासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ही सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
ही प्रक्रिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर विभागातर्फे राबविण्यात येत असून केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय यांच्या २००६ च्या अधिसूचनेनुसार प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम व स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ही सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.
कंपनीने विस्तारित प्रकल्पाअंतर्गत ६,१२,००० TPA क्षमतेचा स्पंज आयर्न प्रकल्प, प्रत्येकी ६,६६,००० TPA क्षमतेचे इंडक्शन व इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, ९,००,००० TPA क्षमतेची रोलिंग मिल तसेच ४० MW (WHRB) व ४० MW (AFBC) क्षमतेचा कॅप्टिव्ह वीज प्रकल्प प्रस्तावित केला आहे.
या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या स्थानिक नागरिक, पर्यावरण संस्था व संबंधित घटकांना सूचना, हरकती अथवा आक्षेप लेखी किंवा तोंडी स्वरूपात नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नागरिकांनी आपले म्हणणे प्रादेशिक कार्यालय, उद्योग भवन, चंद्रपूर येथे किंवा srochandrapur@mpcb.gov.in या ईमेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांसाठी वेबेक्सद्वारे ऑनलाईन सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रकल्पासंबंधी कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र तसेच चामोर्शी तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
Back to top button