गडचिरोली, प्रतिनिधी :-
मानवतेला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या निरागस अनाथ चिमुरडीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने पाशवी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका अनाथ असून तिचा सांभाळ तिचे मामा-मामी करत आहेत. होळीच्या दिवशी गावात सणाचा उत्साह असताना आरोपीने तिला फूस लावून स्वतःच्या घरी नेले. नात्याचा विश्वास आणि तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत २२ वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्या चिमुरडीला गप्प बसण्यास भाग पाडले.
पाच दिवसांनंतर प्रकार उघड
आरोपीच्या भीतीमुळे चिमुरडी पाच दिवस गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी मामी तिला आंघोळ घालत असताना तिच्या शरीरावर जखमा आणि पोटावर सूज दिसून आली. संशय आल्याने मामीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या निरागस मुलीने आपल्यावर झालेला अत्याचार सांगितला. हा प्रकार ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांची तातडीची कारवाई केली
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
समाजाने जागे होण्याची गरज :-
अनाथ आणि निरागस बालिकेवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांसह विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अशा विकृत प्रवृत्तीविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निरपराध बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नसावी, असा कडक संदेश समाजातून जावा आणि अशा घटनांविरुद्ध कठोर भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Back to top button