अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत अपघात टाळण्यासाठी स्वतंत्र मालवाहतूक रस्त्यांची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जड मालवाहतूक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य वाहतुकीसाठी असलेले जुने रस्ते कायम ठेवून कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती व औद्योगिक प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असून मोठ्या ट्रक व मालवाहू वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन वापरातील जुन्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ वाढून वारंवार अपघात घडत आहेत.

या परिस्थितीवर उपाय म्हणून विद्यमान रस्ते सामान्य वाहतुकीसाठी कायम ठेवून त्यालगत किमान दीड फूट उंचीचे स्वतंत्र रस्ते फक्त कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी तयार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी गावांची वस्ती आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात आल्यास स्थानिक नागरिकांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास होत असताना नागरिकांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. स्वतंत्र मालवाहतूक रस्ते निर्माण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि सामान्य वाहतूकही सुरळीत राहील.”

दरम्यान, हे निवेदन राज्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय खान मंत्रालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनाही पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले असता तेथून अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे उत्तर प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही मागणी गांभीर्याने घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker